Showing posts with label मराठी पुस्तक-परिचय. Show all posts
Showing posts with label मराठी पुस्तक-परिचय. Show all posts

Wednesday, April 25, 2012

अमृतवेल: वि. स. खांडेकर

खांडेकरांची हि कादंबरी मागच्या पिढीनी वाचली, आणि आता मी वाचतोय.. खाली दिलेला पहिला परिच्छेद तेव्हा पासून आतापर्यंत माझ्या आई-बाबांच्या लक्षात होता. मी सहज म्हणून कणादच्या घरी हा विषय काढला तर आश्चर्य म्हणजे त्याच्या हि घरी काका-काकूंना तो आठवत होता...!!
अशा प्रसिद्ध कादंबरीतले हे काही उतारे -
****

भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!
****

माणसाचं मन हि अजब सर्कस आहे! माकडचेष्टा करून हसविणारा विदुषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी, मृत्युगोलात बेफामपणे मोटार-सायकल चालविणारा तरुण आणि वाघ-सिंहासारखे हिंस्त्र पशु या सर्वांचे संमेलन आहे ते! वाघ-सिंहाशिवाय सर्कस नाही - उद्दाम वासानंशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि कधी हवेत कडकड चाबूक उडवून सर्कसवाला वाघ-सिंहावर हुकुमत गाजवितो, मात्र हे प्राणी  माणसाळल्यासारखे वाटले, तरी त्यांच्याला हिंस्त्र पशु केव्हा जागा होईल, याचा नेम नसतो!

****

माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटत; नवे निर्माण होतात; पण या नव्या-जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाचा अर्थ येतो, तो त्या सतत गुंफणीतल्या कलेमुळे - गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे!

****
देवालयाचे सौदंर्य पाहून डोळे शिणले. फिरून फिरून पाय थकले.  विसाव्यासाठी मी एका पायरीवर बसतो-न-बसतो, तोच आतडं पिळवटून टाकणारा एक हुंदका माझ्या कानी पडतो. मला  राहवतं नाही! त्या दु:खाच्या दिशेनं मी पुढं जातो.

एका अंधाऱ्या कोपऱ्यात निर्माल्याच्या भल्यामोठ्या ढिगाआड एक वृद्ध गुडघ्यात मन घालून स्फुंदत असलेला दिसतो. पाठीवरून हात फिरवीत मी त्याला विचारतो. 
"आजोबा, तुमचं नाव काय?"
मान वर न करता कापऱ्या स्वरात तो उत्तरतो, 
'परमेश्वर'..
मी मनात चरकतो. वाटतं का वृद्ध बहुधा वेद असावा! 
मी भीत-भीत विचारतो,
"इतकं कसलं दु:ख झालंय तुम्हाला?" 
मान वर करून अश्रू पुशीत वृद्ध उद्धारतो,
'माझ्या एकुलत्या एका मुलानं मला फसवीलं - माझा गळा कापला! किती उमेदीनं, किती आशेनं मी त्याला लहानाचा मोठा केला! पण - '
मी उत्सुकतेनं प्रश्न करतो,
"तुमच्या मुलाचं नाव काय?"
दीर्घ सुस्कारा सोडीत वृद्ध उद्धारतो,
'मनुष्य!'

वसूचे डॉक्टर मला भेटायला आले, तेव्हा हा भास नाहीसा झाला- मन अधिक अस्वस्थ करून! बुद्ध, ख्रिस्त, गांधी, श्र्वायत्झर, विवेकानंद - अगणित नावं आठवली. किती संतानी, किती महात्म्यांनी, किती देवमाणसांनी, किती समाजसेवकांनी परमेश्वराचे अश्रू आजपर्यंत पुसले असतील, पण ते अजून वाहत आहेत - सारखे वाहतच आहेत. 

हे असेच चालायचं? युगामागुन युगं आली आणि गेली तरी? परमेश्वराला सतत रडायला लावणारे, आणि त्याची आसवं पुसण्यासाठी धडपडणारे, या दोन जाती जगात सदैव असाव्यात, असाच सृष्टीचा संकेत आहे काय? 

राधेय: रणजीत देसाई

कर्णावरच्या राधेय या कादंबरीतील काही वाक्यं..
****

नाही तरी जीवन या नावेसारखेच असते. जीवनप्रवाहावर केव्हारती एक नाव सोडली जाते. ऋणानुबंधाचीदोन दुबळी वळी हाती दिली जातात. अहंकाराचे शीड उभारलेले असते. पण तेवढ्यावर  थोडाच पैलतीर गाठला जातो? अनुकूल दैवाचे वारे लाभले तरच पैलतीर गाठता येतो, नाही तर प्रवाहपतित होऊन त्या लाटेवर डोलत राहण्याखेरीज काहीही उरत नाही

****

मी  योद्धा  आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबर सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे.

****

Monday, October 10, 2011

पानिपत

पानिपत... मराठी मनाचा दुखरा कोपरा.. हृदयावर झालेली एक खोल जखम.. अडीचशे वर्ष झाली तरी भळभळून वाहणारी जखम.... १४ जानेवारी १७६१, भारतवर्ष सुखाची संक्रांत साजरी करत असताना भारताच्या रक्षणासाठी महाराष्ट्राची एक अख्खी पिढी लढली... साक्षात मृत्यूशी........लढली आणि अमर झाली...

पानिपतचं युद्ध.... राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण यांचा मांडलेला यज्ञ आणि त्यात प्राणांची आहुती देणारे मराठी वीर...

अनाकलनीय गुंता, कोण विजेता, कोण पराभूत.... ..रुढार्थाने  पाहिले तर मराठ्यांचा पराभव.. दारूण पराभव.. ..पण इतिहासाच्या अभ्यासात एक लढाई आणि त्याचा निकाल एवढेच पाह्यचे नसतात.. युद्धानंतर विजेत्या अब्दालीची परत भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिम्मतच झाली नाही... आणि दहा वर्षातच  पेशवे परत सार्वभौम झाले... पण एक पिढी गमावल्याच दुख एवढे जास्त आहे कि आजही पानिपतवर महाराष्ट्रभर चर्चासत्रे होत असतात...

विश्वास पाटलांच पानिपत मी आतापर्यंत किती वेळा वाचले मलाही माहित नाही, आठवी नववीत पहिल्यांदा वाचल्यानंतर मी त्याची असंख्य पारायणे केली आहेत... बहुधा त्यामुळेच जेव्हा मी शनिवारवाड्या समोरून जातो, तेव्हा  माझा भारतीय असण्याचा, महाराष्ट्राबद्द्लाचा,  पुण्याबद्द्लाचा अभिमान उफाळून येतो...  ( मी प्रांतीयतावादाला  मुळीच थारा देत नाहीये... भारतीयत्व प्रथम, नंतर मराठीपणा)

खाली पुस्तकातली  सदाशिवरावभाऊंच्या  मुखातली काही वाक्य आहेत... दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर भाऊंनी मृत्यूशी जो जंग आरंभला होता त्याचे अत्यंत समर्पक वर्णन त्यात आहे..

मृत्यूचं दर्शन मला अनेकदा घडलं आहे, नदीपल्याडच्या नगरात राहणाऱ्या आणि अधेमधे पाणवठ्यावर भेटणाऱ्या सवंगड्यासारखा तो मला अनेकदा  भेटला आहे, आणि रणांगणावरच  मृत्यू भेटला तर विजेच्या गोळ्याला गिळणाऱ्या धरतीसारखा मीही त्याला कवेत घेईन आणि भस्म होईन... (पृष्ठ क्रमांक ९९)

पानिपतची आमची ही मोहीम काही औरच आहे. मराठी मातीच्या सर्वोच्च सद्गुणांचा आणि दुर्देवी दुर्गुणांचा हा सुंदर मिलाफ आहे. उपासापोटी आमची पथके ह्या जागी हिमतीने खडी आहेत. काळासारख्या वैऱ्याने पुरता पेच टाकला आहे, पण आपापसातल्या लाथाळ्या, कुरबुरी, भाऊबंदकी तरी मिटलेली  दिसते का? आमच्या मराठी मातीची महती न्यारीच. यातले खडे  बाजूला केले तर ह्या मातीतून भव्य चिरेबंदी  यशोमंदिर  उभे राहू शकते, पण मातीत मिसळलेले खडे काही वखताला इतके प्रबळ असतात कि ते साऱ्यांचीच माती करून टाकतात. (पृष्ठ क्रमांक ४२१)

मीही एक क्षुल्लक प्राणी!! न राजा, ना कुठल्या दौलतीचा धनी! पण तुमच्यासारखाच इमानाचा, जिद्दीचा वसा घेऊन ह्या इथे गाडून उभा राहिलो आहे. इकडे टाका घालावा, तर तिकडे उसवते! सारे विश्वच फिरले आहे. तरीही आम्हाला उमेद, जिद्द तुमच्यासारख्याच मर्दांच्या संगतीने आणि शूरांच्या पंगतीने लाभली आहे. (पृष्ठ क्रमांक ४५१)

आपल्या देहाची उंची ती कोण? फार फार तर दोन-तीन गज, पण ध्येयाची उंची मोजायला हजारो गज पुरायचे नाहीत.  (पृष्ठ क्रमांक ४८०)

अशी असंख्य वाक्यं आणि तो संग्राम...   भारताचा (म्हणजेच महाराष्ट्राचा) परचक्रा विरुद्धचा  संघर्ष अनुभवायचा असेल... तर पानिपत नक्कीच वाचा...

Saturday, July 2, 2011

ययाती

लेखक : वि. स. खांडेकर

काही गोष्टी घडण्यासाठी योग असावे लागतात हेच खरं नाहीतर मी आतापर्यंत 'ययाती' न वाचण्याला काही कारणंच नव्हत. शाळेतल्या अगदी सातवी-आठवी पासून मी 'ययाती' चं कौतुक आलो होतो. पन्नाशीच्या दशकात प्रसिद्ध झालेली हि कादंबरी आजही सर्वांच्या मुखी आहे, ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा १९७४ साली मिळाला आहे. दर वेळेस मराठी साहित्यावर चर्चा करताना तू ययाती वाचलीय का? या प्रश्नाला नाही उत्तर देताना मला लाजचं वाटायची.

शेवटी एकदा अनपेक्षित पणे तो योग आला. उगाच फिरता फिरता अक्षरधारा नजरेस पडल, आणि वेळ घालवायचा म्हणून आत शिरलो. एक-एक पुस्तक चाळत मी ययाती पर्यंत पोहोचोलो. अनायासे पुस्तक हि समोर होतं, वेळही होता, वाचायला घेतलं, पहिल्या एक-दोन पानातच निर्णय झाला, आणि मी ते खरेदी केलं.

'ययाती' हाती घेतल्यावर पुस्तक खाली ठेवणं शक्यच झालं नाही. खांडेकरांच्या साहित्याबद्दल 'पुस्तक खूप चांगल आहे', असे म्हणण वेडेपणाच ठरेल., उत्तुंग हिमालयच तो, त्याचे मी काय कौतुक करणार. कथेच्या ओघात मध्यरात्र झाली तरी ते पुस्तक खाली ठेवाव असे अजिबात वाटले नाही.

पुस्तक निम्म्यावर आला तरी मला मुखपृष्ठावराच्या घोड्याचा अर्थ समजला नव्हता. मी विचार करत होतो इथे घोडा कशासाठी आहे. आणि मग ययातीच्या एका स्वप्नात- स्वागतात खांडेकरांचे ते रूपक समोर आलं.

ययाती वाहवत गेलाय, बरोबर-चूक हे त्याला कळेनास झालंय, आणि या अवस्थेत त्याला स्वप्न पडतं. तो एका रथात बसलाय, रथ एका अरुंद रस्त्यावरून चाललाय, रस्त्याच्या एका बाजूला उंच पर्वत आणि दुसरीकडे खोल दरी. पाच घोडे रथ ओढत आहेत, ते बेधुंध होऊन धावतायेत, आणि त्यांच्या या बेधुंधपणाची ययातीला भीती वाटतीय, आणि ती भीती खरी ठरते, एक घोडा बेभान होऊन दरीकडे पळत सुटतो. ययातीच्या प्रयत्नांना दाद न देता,तो घोडा, रथ आणि स्वत ययाती दरीत पडतात. आणि ययाती खाडकन झोपेतून जागा होतो. मदिरा
आणि मदिराक्षी (खांडेकरांचे शब्द) यात नखशिखांत डुबलेल्या ययातीची मनस्थिती, त्याला वाटणारी भीती, यांना दर्शवणारं हे रूपक अगदी नकळत पणे संयमाचा संदेश देऊन जातं.
असेच अगदी दुसरं स्वागत, ययाती वडिलांना म्रुत्युशय्येवर पाहताना एका विलासी राजपुत्राची आणि मृत्यूची झालेली पहिली नजरानजर...

या आणि अशा अनेक प्रसंगांनी 'ययाती' एक उत्तम कादंबरी म्हणून साहित्याचा विलक्षण अनुभव करून देते.आणि ती उशिरा का होईना पण मी ती वाचली आहे, याचा मला आनंद होतोय!!